अलिबाग | ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटविण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकारणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
समाधी हटवण्यासाठी त्यांनी सरकारला ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे.हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेदेखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणार्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार ३१ मे २०२५ अखेरपर्यंत सदर अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरुन व दुर्गराज रायगडवरुन कायमस्वरुपी हटविण्यात यावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्याची शिवप्रेमींचीही मागणी
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित ‘वाघ्या’ कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे. या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध केला आहे. आता संभाजीराजेंनीही पुन्हा तीच मागणी केली आहे.
वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. ३१ मेपर्यंत सरकारने ती कपोलकल्पित समाधी हटवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता या मागणीचा विचार सरकारकडून केला जाणार का? तसेच ही समाधी हटवली जाणार का? हे प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरीत आहेत.