मच्छिमारांसाठी राज्य सरकारचा क्रांतिकारक निर्णय , मत्स्यव्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा

४ लाख ८३ हजार मच्छिमारांना होणार फायदा ; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

By Raigad Times    23-Apr-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | मत्स्यव्यवसायाला राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि निर्णय मंगळवारी (२२ एप्रिल) राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मच्छिमार, मत्स्यसंवर्धकांना अनेक सवलती मिळून, राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छिमारांना याचा फायदा होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.
 
श्या निर्णयाबद्दल ना.राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. ते मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदे यांच्यासह कोळीबांधव उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले की, देशाला परकीय चलन तसेच प्रथिनयुक्त अन्न पुरविण्यात मत्स्य व्यवसायाचे मोठे योगदान आहे.
 
राज्य कृषीप्रमाणे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात चांगले उत्पादन व उत्पन्न घेण्यास सक्षम आहे. आजच्या निर्णयामुळे राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छिमारांना याचा फायदा होणार आहे. मत्स्य व्यवसायास कृषीचा दर्जा नसल्याने मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलतीपासून वंचित राहावे लागत होते. राज्यात आता मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देऊन मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थाचे बळकटीकरण होणार आहे.
 
यामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार आहे. कृषी क्षेत्रास लागणारे बियाणे, ट्रॅक्टर, औवजारे, खते इत्यादी करीता शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो. त्याचप्रमाणे मच्छिमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्य खरेदी, पॅडलव्हील एअरेटर्स, एअरपंप करीता आता मत्स्यव्यवसायिकांना अनुदान या निर्णयामुळे मिळणार आहे. शीतगृह व बर्फ कारखान्याला अनुदान, शेतकर्‍यांना मिळणार्‍या पीक विमाप्रमाणे मत्स्य शेतकर्‍यांना, मत्स्य संवर्धकांना मत्स्यबीजांच्या मत्स्यो उत्पादनाच्या नुकसानीसाठी मत्स्य विमा योजना, दुष्काळ किंवा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यास कृषी क्षेत्रात ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना शासनातर्फे रिलीफ पॅकेज जाहीर होते, त्याचप्रमाणे मच्छिमारांनाही शासनातर्फे रिलीफ पॅकेज मिळणार असल्याचे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.
 
मत्स्यपालनाला कृषीचा दर्जा मिळाल्याने किनारी आणि अंतर्गत भागाचा आर्थिक विकास होणार आहे. याचबरोबर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने मच्छिमार शेतकर्‍यांना वीज शुल्कात अनुदान मिळणार आहे. मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धन प्रकल्प, संबंधित कारखाने, प्रक्रिया युनिट यांना कृषी दराने वीज मिळणार आहे. मत्स्य शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा इत्यादी आणि कृषीनुसार अल्पदराने विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.