वीज ग्राहकांना पुन्हा शॉक! वीज दरकपातीला स्थगिती

वीज नियामक आयोगाकडून निर्णयाला स्थगिती

By Raigad Times    03-Apr-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नवीन वीज दर आदेशावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण (एमएसईबी) कंपनी लिमिटेडच्या विनंतीनुसार आयोगाने (एमईआरसी) २८ मार्च रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. १ एप्रिल २०२५ पासून नव्या दरकपातीचा निर्णय लागूहोणार होता, परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणले आहे.
 
त्यामुळे, आता महावितरणकडून करण्यात आलेल्या दरकपातीला तात्पुरती स्थगिती देण्यातआली आहे.मिळालेला आनंद काही क्षणापुरताच राहिला असून त्यांना पुन्हा लाईट बिलाचा शॉक बसला आहे, असेच म्हणावे लागेल. महावितरणच्या वकिलांनी सांगितले की, या वीज दर आदेशातील चुका आणि विसंगती या वर्ष २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांच्या नियामक कालावधीतील वीज दराच्या मूळ स्वरूपावर परिणाम करत आहेत.
 
तसेच, हा दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे आणि अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी महावितरणने केली आहे. महावितरणच्या वकिलांनी यासंदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिल २०२५ च्या अखेरीस सादर केली जाईल, असे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने २८ मार्च रोजी जाहीर केलेल्या नवीन वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
 
तसेच, महावितरणची पुनरावलोकन याचिका दाखल होईपर्यंत ३१ मार्च २०२३ रोजी जाहीर झालेला आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी लागू असलेला जुना दरच लागू राहील, असेदेखील आयोगाने स्पष्ट केले आहे. महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल केल्यानंतर एमईआरसीकडून तात्काळ स्टे ऑर्डर देण्यात आली आहे. महावितरणचा तोटा वाढत नुकसान आणि ग्राहकांचे देखील हित नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.
 
राज्यात १ एप्रिलपासून लागू होणार्‍या नव्या दरासंदर्भात महावितरणकडून याचिका दाखल झाली होती. मात्र, महावितरणकडून पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटाला पुनरावलोकन याचिका महावितरण दाखल करणार आहे. नियामक आयोगाने नफा दाखवत महावितरणच्या सर्वच गटातील ग्राहकांनादिलासा दिला होता. मात्र, महावितरणकडून तोटा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.